Friday, November 24, 2023

प्रायोगिक पद्धती

प्रायोगिक पद्धती (Experimental Method)


मानसशास्त्राच्या इतर अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धती अचूक व व्यवस्थितपणे निष्कर्ष मिळवून देणारी पद्धती आहे. प्रायोगिक पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे एक आणि इतर परिवर्त्यांमध्ये संबंध प्रस्थापित केला जातो; ज्याला सहसंबंध म्हटले जाते. यामध्ये विश्वसनीयता व वस्तुनिष्ठता जास्तीत जास्त असते.

मानसशास्त्रातील प्रयोग हे इतर प्रयोगांपेक्षा वेगळे असतात. मानसशास्त्रामध्ये प्रयोग करीत असतांना खालील टप्प्यातून जावे लागते. 

  • समस्या
  • गृहीतके
  • गृहीतके तपासणे
  • परिस्थितीवर नियंत्रण
  • निरीक्षणाची नोंद व निष्कर्ष
  • पडताळा


अशा या वरील सहा घटकांतून अभ्यास म्हणून निवडलेल्या विषयाला सामोरे जावे लागते तेव्हा त्याचा निकाल स्पष्ट होतो. प्रयोग करीत असतांना काही महत्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतात. ते पुढीलप्रमाणे -

i) गृहितके (Hypothesis) 

विषयाचा अभ्यास करण्यासाठी समस्या आपल्यासमोर उभी राहते. निवडलेल्या समस्यांचे उत्तर आधीच आपल्याला 'अमुक असेल' असे वाटते. अशा या समस्येच्या संभाव्य उत्तरालाच गृहीतक म्हटले जाते. उदा. अंतर्मुखी व्यक्ती कमी बोलतात, आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक नैराश्य जास्त असते, अशी गृहीतके मांडली जातात.


ii) परिवर्त्य (Variables) 

प्रयोगात परिवर्त्याची भूमिकाही अतिशय महत्वाची असते. असे हे परिवर्त्य म्हणजे ज्यामध्ये परिवर्तन घडून येवू शकते असा घटक होय. प्रयोगामध्ये प्रयोग परिस्थितीवरच नियंत्रण ठेवले जाते. प्रयोगामध्ये खालीलप्रमाणे परिवर्त्याचा वापर केला जातो.


अ) स्वतंत्र परिवर्त्य (Independent Variables) - 

स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे असे परिवर्त्य होय; ज्यात प्रयोगकर्ता बदल करतो व ज्याचे नियंत्रण हे प्रयोगकर्त्याच्या हातात असते. यातील परिवर्तन हे इतर कोणत्याही घटकावर अवलंबून नसल्याने याला स्वतंत्र परिवर्त्य म्हटले जाते. उदा. कपड्याचा वर्तनावर होणारा परीणाम. यातील कपड्यावर प्रयोगकर्त्याचे पूर्णतः नियंत्रण असते. कोणते कपडे केव्हा द्यायचे व तपासायचे हे प्रयोगकर्त्यावर अवलंबून असते.


ब) आश्रीत परिवर्त्य (Dependent Variables) 

आश्रीत परिवर्त्य म्हणजे असे परिवर्त्य जे स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतात, स्वतंत्र परिवर्त्यात बदल घडवून आणल्यास आश्रीत परिवर्त्यामध्ये बदल घडून येतो. प्रयोगात उद्दीपकांना प्रतिक्रिया दिल्या जातात. यालाच आश्रीत किंवा परतंत्र परिवर्त्य असे म्हटले जाते. आश्रीत परिवर्त्य हा एक परिणाम आहे तर स्वतंत्र परिवर्त्य हे त्याचे कारण आहे. उदा. अध्ययन प्रयत्नामुळे स्मृती क्षमतेत किंवा धारणेत वाढ होते, यातील घारणक्षमता ही अध्ययन प्रयत्नांवरच अवलंबून आहे म्हणून ते आश्रीत परिवर्त्य आहे.


क) नियंत्रीत परिवर्त्य (Controlled Variables) - 

मानवी वर्तनावर बरेच घटक हे परिणाम करीत असतात. यातील सर्वच घटक हे आवश्यक नसतात. त्यातील काही घटकांना थांबवून ठेवावे लागते वा नियंत्रीत ठेवावे लागते. अशा सर्व परिवर्त्यांना नियंत्रीत परिवर्त्य असे म्हणतात. उदा. खोलीचे प्रत्यक्षीकरण हा प्रयोग करीत असतांना ध्वनी व प्रकाश या बाहेरच्या घटकांना नियंत्रीत करणे गरजेचे असते.


iii) गट (Group) - 

मानसशास्त्रीय प्रयोग करीत असतांना समूह तयार केले जातात ते पुढीलप्रमाणे-

अ) प्रायोगिक गट (Experimental Group) 

प्रायोगिक गटाला प्रयोगकर्ता हा प्रशिक्षण देतो. प्रयोग गटातील व्यक्ती ह्या नियंत्रीत गटातील व्यक्तीप्रमाणेच असतात. त्यांची बुद्धि, वय, उंची, लिंग या आधारावर सारखेपणा असतो.


ब) नियंत्रीत गट (Controlled Group) - 

नियंत्रीत गटातील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जात नाही. परंतु प्रायोगिक गटातील व्यक्तीसारखेच गुणधर्म याही समुहात असतात. स्वतंत्र परिवर्त्याचा परिणाम हा नियंत्रीत गटासाठी वापरला जात नाही.


प्रायोगिक पद्धतीचे फायदे

  • प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगकर्ता बाह्य घटकांना नियंत्रीत करतो.
  • इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीत निष्कर्ष बिनचूक असतात.
  • प्रायोगिक पद्धतीत प्रयोग हे वारंवार करुन पाहिले जातात.
  • या पद्धतीत सहसंबंध शोधला जातो. 
  • या पद्धतीमुळे शास्त्रीय निकाल मिळतो.
  • या पद्धतीमुळे विश्वसनीय व सत्य माहिती मिळण्यास मदत मिळते.


प्रायोगिक पद्धतीचे तोटे 
  • प्रयोगकर्त्याच्या अपेक्षांचा प्रयोगावर परिणाम होतो. 
  • प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रत्येक घटकालाच नियंत्रीत ठेवणे अशक्य आहे.
  • सर्वच परिस्थितीमध्ये प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य होत नाही.
  • प्रायोगिक गट व नियंत्रीत गटातील व्यक्ती आपल्या सांगण्यानुसारच ऐकतील याची शक्यता कमी असते.
  • प्रायोगिक पद्धतीमुळे व्यक्तीच्या वर्तनात कृत्रीमता येते.
  • व्यक्तीच्या आंतरिक व बाह्य घटकांवर सतत नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. प्रत्येक वेळी व्यक्तीचे वर्तन सारखेच राहील हे शक्य होत नाही. 

प्रायोगिक पद्धतीत अनेक प्रकारचे संभाव्य तोटे दिसत असले तरी शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता आजच्या स्थितीत प्रायोगिक पद्धती मोठ्या प्रमाणात अवलंबिली जाते.

Labels:

Thursday, November 23, 2023

बुद्धिमत्तेचे सिद्धांत

 बुद्धिमत्तेचे सिद्धांत (Theories of Intelligence)



बुद्धिमत्ता ही एकंदरीत कसा घटक आहे याबाबत शास्त्रज्ञांनी शोध घेतला. बुद्धिमत्तेसंदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेमध्ये कोणते पैलू असतात हे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामधून स्पष्ट केलेले आहे; त्यातील काही महत्वाचे सिद्धांत पुढीलप्रमाणे -


१) एक घटक सिद्धांत (Unifactor Theory)

बीने या मानसशास्त्रज्ञाने या 'एक घटक सिद्धांता'चे प्रतिपादन केलेले आहे. बुद्धिबाबतचा हा पहिला सिद्धांत मानला जातो. या सिद्धांतामध्ये बीने यांनी बुद्धीला एक घटक म्हणून स्विकारले आहे. बुद्धी हा एक स्वयंपूर्ण असा घटक आहे. बुद्धीमध्ये एक वा अनेक असे घटक कार्यरत नसतात असे बीने यांचे मत आहे.

या सिद्धांतानुसार, व्यक्ती कोणतेही कार्य करीत असतांना त्या कार्यात बुद्धीला अतिशय महत्वाचे स्थान आहे. बुद्धीशिवाय कोणतेही कार्य घडून येवू शकत नाही. बुद्धी एक प्रकारची मानसिक शक्ती आहे; ज्यामुळे व्यक्तीच्या क्रियाप्रक्रिया सुव्यवस्थित घडून येण्यासाठी मदत मिळत असते. ही मानसिक शक्ती व्यक्तीच्या मानसिक कार्याचे नियंत्रण तसेच संचालन घडून आणत असते. त्याचबरोबर व्यक्ती जे वर्तन घडवून आणीत असतो अशा सर्वच वर्तनाला मानसिक शक्तीच प्रभावीत करीत असते. व्यक्तीचे दैनंदिन वर्तन हे व्यक्तीच्या मानसिक शक्तीमुळेच प्रस्थापित व प्रवाहित होत असते. या सिद्धांताचे समर्थन स्टर्न आणि एसमन या मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा केलेले आहे.

बुद्धी हा एकप्रकारे एकदुसऱ्या भागात न विभागला जाणारा एक संघ असा घटक आहे. कोणतेही कार्य करीत असताना बुद्धी ही एकवटून कार्य करीत असते. ती एकसंघ संपूर्ण असे रुप धारण करुनच कोणतेही कार्य पार पाडते, असे हा सिद्धांत सांगतो. या सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन करुन टिकाटिप्पणी केली. सद्य:स्थितीत या घटकांचा समुच्चय म्हणून समोर आलेला आहे. 


२) जी घटक सिद्धांत (G - Factor Theory)

हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय स्पीयरमन यांना जाते. चार्लस स्पीयरमन यांच्या मते, कुठलेही कार्य करीत असताना व्यक्ती प्राथमिक सामान्य घटकांचा उपयोग करतो यालाच 'जी फॅक्टर' (G Factor) असे म्हटले जाते. उदा. खेळ खेळणे, संगणक हाताळणे, गणित सोडविणे, गाडी चालविणे इ. असे घटक सर्वांनाच जमतात परंतु काही व्यक्तींमध्ये या सामान्य घटकांसोबतच विशेष घटकही असतात, त्याला 'एस फॅक्टर' (S Factor) असे संबोधले जाते. उदा. बासरी वाजविणे, गाणे म्हणणे, संशोधक होणे, संगीतकार बनणे, अर्थतज्ज्ञ होणे इ. अशा विशिष्ट क्षमता काही व्यक्तीत असतात. त्यामुळे ते विशेष नावारूपास येतात. स्पीयरमन यांनी हा सिद्धांत सामान्य घटकांच्या आधारावर सांगितलेला आहे. त्यामुळे या सिद्धांताला 'जी फॅक्टर' (G Factor) सिद्धांत म्हणतात.


३) प्राथमिक मानसिक क्षमता सिद्धांत (Primary Mental Abilities Theory)

हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय थर्स्टन यांना जाते. बाला 'सप्त घटक सिद्धांत' म्हणूनही ओळखले जाते. थर्स्टन यांनी बुद्धी ही अनेक स्वतंत्र घटकांपासून बनलेली आहे असे म्हटले. थर्स्टन यांनी सांगितलेले सात घटक पुढीलप्रमाणे -

शाब्दिक आकलन क्षमता : कल्पना, संकल्पना व शब्दाचा अर्थ समजण्याची क्षमता म्हणजे शाब्दिक आकलन क्षमता होय.

शब्द ओघ : शब्दावर प्रभुत्व गाजविण्याची क्षमता म्हणजे शब्द ओघ क्षमता होय.

संवेदन वेग : वस्तू घटकाचा अर्थबोध होण्याची क्षमता म्हणजे संवेदन वेग होय.

स्मृती : वस्तू-वस्तूंमधील संबंध लक्षात आणण्याची क्षमता म्हणजे स्मृती होय.

संख्या क्षमता : संख्याच्या साहाय्याने समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे संख्या क्षमता होय.

अवकाश क्षमता : भौमितीय ज्ञान होण्याची क्षमता म्हणजे अवकाश क्षमता होय.

तर्क क्षमता : समोरील घटकाशी तर्क लावण्याची क्षमता म्हणजे तर्क क्षमता होय.

अशाप्रकारे थर्स्टन यांनी वरील सात घटकांचा आधार घेवून बुद्धीचे स्पष्टीकरण केलेले आहे.


४) विविधांगी बुद्धिमत्ता सिद्धांत (Multiple Intelligence Theory) 

हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय गार्डनर यांना जाते. हॉवर्ड गार्डनर यांनी हा सिद्धांत १९८३ मध्ये 'Frame of Mind: The Theory of Multiple Intelligence' या पुस्तकात प्रतिपादित केलेला आहे. गार्डनर यांनी बुद्धीला संकुचित असे समजले नाही तर बुद्धी ही विविध घटकांचे अफाट असे केंद्र आहे असे त्यांनी मानले. असे हे विविधांगी घटक व्यक्तीची हुशारी, व्यक्तिमत्व गुण आणि क्षमता यातून प्रदर्शित होत असतात. गार्डनर यांनी व्यक्तीमध्ये आठ प्रकारचे बुद्धीविषयक घटक असतात असे सांगितलेले आहे. असे आठ प्रकारचे घटक पुढीलप्रमाणे -

दृश्य:अवकाशीय बुद्धिमत्ता (Visual-Spatial Intelligence) 

गार्डनर यांनी हा बुद्धिमत्तेचा पहिला घटक स्पष्ट केलेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये दृश्य- अवकाशसंबंधी बुद्धिमत्ता जास्त असते अशा व्यक्ती, दृश्य व अवकाश अनुमान अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात. त्या चित्र, दृश्य, नकाशे, संकेतस्थळांना चांगल्या पद्धतीने समजू शकतात.

भाषीय-शाब्दिक बुद्धीमत्ता (Linguistic-Verbal Intelligence)- 

गार्डनर यांनी हा बुद्धिमत्तेचा दुसरा घटक सांगितलेला आहे. भाषीय- शाब्दिक बुद्धी ज्या व्यक्तीत जास्त असते अशा व्यक्तीमध्ये शब्द, भाषा व लिहिणे यावर जास्त प्रभुत्व असते. अशा व्यक्ती चांगल्या पद्धतीने बोलू आणि लिहू शकतात. तर्क-गणितीय बुद्धिमत्ता (Logical- Mathematical Intelligence) - गार्डनर यांनी हा तिसरा घटक स्पष्ट केलेला आहे. तर्क-गणितीय बुद्धिमत्ता अधिक असणाऱ्या व्यक्ती ह्या समस्याचे विश्लेषण तसेच गणितीय प्रक्रिया अधिक चांगल्यारीत्या करू शकतात. असे व्यक्ती अंक, संबंध आणि प्रकाराला चांगल्या पद्धतीने समजतात.

शरीर-गतीय बुद्धीमत्ता (Bodily-Kinesthetic Intelligence) - 

गार्डनर यांनी हा चवथा घटक सांगितलेला आहे. शरीर-गतीय बुद्धिमत्ता ज्या व्यक्तीमध्ये अधिक असते अशा व्यक्ती शारीरिक हालचाली आणि यांत्रिकरीत्या स्वतःला नियंत्रित चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांच्या हालचाली अधिक योग्यतेने करू शकतात.

संगीत बुद्धिमत्ता (Musical Intelligence) - 

गार्डनर यांनी हा बुद्धिमत्तेचा पाचवा घटक सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये संगीतविषयक बुद्धिमत्ता ही अधिक असते अशा व्यक्ती ह्या चांगल्या रिदम्मध्ये गावू शकतात. ते चांगले गीतगायक व सुंदर अशा रचना करणारे ठरतात.

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) - 

हा बुद्धिमत्तेचा सहावा घटक गार्डनर यांनी सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीत आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता ही अधिक असते, अशा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी आपले संबंध चांगल्या पद्धतीने जोपासत असतात. त्यांना इतरांच्या भावना, इच्छा राखण्यात आनंद मिळत असतो.

अंर्तवैयक्तिक बुद्धिमत्ता (Intrapersonal Intelligence) -

हा बुद्धिमत्तेचा सातवा घटक त्यांनी स्पष्ट केलेला आहे. ज्या व्यक्तीत अंर्तवैयक्तिक बुद्धिमत्ता ही जास्त असते अशा व्यक्ती स्वत ला जाणणाऱ्या व स्वतःला जास्त समजून घेणाऱ्या असतात. या व्यक्ती स्वतः बाबतीत अधिक जागरूक असतात.

नैसर्गिक बुद्धिमत्ता (Naturalistic Intelligence) 

हा बुद्धिमत्तेचा आठवा घटक त्यांनी सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीत नैसर्गिक बुद्धिमत्ता ही जास्त असते अशा व्यक्ती नैसर्गिक गोष्टीच्या अधिक जवळ जाणाऱ्या असतात. नैसर्गिक संबंध अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्याची व समजण्याची त्यांच्यात क्षमता दिसून येते.

अशा प्रकारे गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे आठ घटक स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या सिद्धांतावरुन व्यक्तीच्या बुद्धिमत्तेच्या अनेक पैलूची उकल होण्यास मदत मिळाली. त्यांचा सिद्धांत हा बुद्धिमत्ता घटकाच्या अधिक जवळ जाणारा आहे.


५) बहुघटक सिद्धांत

बहुघटक सिद्धांत हा गिलफोर्ड यांनी मांडला. यालाच 'त्रिमिती सिद्धांत' या नावाने सुद्धा ओळखले जाते. गिलफोर्ड यांनी बुद्धी ही अनेक घटकांनी बनलेली असते हे स्पष्ट केले. बुद्धीमध्ये १५० असे घटक असतात असे त्यांनी सांगितले. या घटकाचे तीन परिमितीत रूपांतरण होते. ते घटक पुढीलप्रमाणे -

माध्यम : उद्दीपक किंवा माहिती समजून घेणाऱ्या घटकास माध्यम म्हणतात. माध्यम पाच प्रकारचे आहे- दृश्य, श्राव्य, प्रतिकात्मक, आशयात्मक व वर्तनात्मक इ.

प्रक्रिया : उद्दीपकाला अनुसरून मानसिक क्रिया घडून येण्याला प्रक्रिया म्हणतात. प्रक्रिया पाच प्रकारच्या आहेत. मूल्यांकन, एककेंद्री विचार, बहुकेंद्री विचार, स्मृती, आकलन इ.

निष्पत्ती : मानसिक क्रियेची निष्पत्ती होण्याच्या प्रक्रियेला निष्पत्ती म्हणतात. याचे ६ प्रकार वर्ग, संबंध, संरचना, रूपांतर, गभितार्थ. अशाप्रकारे माध्यम, प्रक्रिया व निष्पत्ती यात एकूण १६ घटक असलेले दिसून येतात. या आधारे थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण केलेले आहे.


६) त्रिचाप सिद्धांत (Triarchic Theory)

हा सिद्धांत स्टर्नबर्ग यांनी मांडलेला सिद्धांत आहे. स्टर्नबर्ग यांचा सिद्धांत माहिती प्रक्रिया दृष्टीकोनावर आधारीत सिद्धांत आहे. त्यांनी बोधात्मक विचारसरणी स्विकारलेली दिसून येते याला 'त्रिकूट सिद्धांत' सुद्धा म्हणतात. स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेच्या तीन बाजू मांडलेल्या आहे.

१) घटकात्मक बुद्धिमत्ता : यामध्ये माहिती प्रक्रियणाची क्रिया घडून येते. व्यक्ती घटकाला अनुसरून प्रत्यक्ष कृती करते. 

२) अनुभवाश्रीत बुद्धिमत्ता : आधीच मिळालेल्या अनुभवाचा वापर व्यक्ती नवीन कौशल्य संपादनासाठी करते.

३) संदर्भीय बुद्धिमत्ता : व्यक्ती परिस्थितीनुसार लवचिक मार्ग काढण्याचा प्रयत्न करते व यशस्वी होते.

अशा प्रकारे स्टर्नबर्ग यांच्या मते, वरील तीनही घटकांचा व्यक्ती वापर करते व यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करते. या घटकातून स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण केलेले आहे.


७) अधिश्रेणी सिद्धांत (Hierarchical Theory)

अधिश्रेणी सिद्धांत हा फिलीप वर्नन यांनी १९५० मध्ये मांडला. वर्नन यांनी शंकूच्या आधारे बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण केलेले आहे. 

शंकूच्या सर्वात वर सामान्य घटक आहे, जो सर्वच कार्यामध्ये दिसून येणारा घटक आहे. दुसरा प्राथमिक मानसिक क्षमता घटक आहे. कोणतेही कार्य करतांना वेगळ्या व विशेष पद्धतीने कार्य करीत असल्यास हा घटक विशेषत्वाने दिसून येतो. यात तिसरा घटक हा विशेष घटक आहे. व्यक्तीतील सामान्य व्यक्तीपेक्षाही वरच्या स्तरावर विशेष क्षेत्रात कार्य करण्याची तसेच नावारुपास येण्याची उर्मी दिसून येते. हा घटक क्वचित व्यक्तीत दिसतो


८) कॅटेलचा बुद्धीमत्ता सिद्धांत (Cattell's Theory of Intelligent)

कॅटल या शास्त्रज्ञाने बुद्धीबाबतच्या सिद्धांतामध्ये दोन घटकांचा शोध घेतलेला आहे.

१) तरल बुद्धिमत्ता (Fluid Intelligence)

रेमंड कॅटल यांनी तरल बुद्धिमत्ता हा घटक सांगितलेला आहे. तरल बुद्धिमत्ता ही व्यक्तीला नवीन वेळेमध्ये ज्या समस्या येतात त्या वेळेत समस्या सोडवून देणारी प्रक्रिया आहे. व्यक्तीजीवनामध्ये नवीन विचार करणे, नवीन संकल्पना बनविणे, नवीन कार्य करणे, शिकणे, नवीन योजना आखणे, नवीन मार्गक्रमण करणे इ. कार्य करायची असतात. उदा. चित्र काढणे, गाडी चालविणे, रंग भरणे, लिखाण करणे इ. वेळी नवीन प्रक्रियाच आपल्याला पार पाडायच्या असतात. या सर्व वेळी तरल बुद्धीमत्तेचाच उपयोग होतो.

तरल बुद्धिमत्तेमुळे व्यक्ती नवीन समस्या सोडवू शकतो. नवीन वेळेत समायोजन साधून कार्य करीत असतो. बऱ्याच वेळेत व्यक्ती स्वतःलाच कामामध्ये नवीनता आणण्यासाठी प्रेरीत करीत असते. हे तरल बुद्धिमत्तेमुळेच शक्य होत असते.


२) स्फटीक बुद्धिमत्ता (Crystallized Intelligence)

व्यक्ती जीवन जगत असतांना पुर्वानुभवाचा आधार घेत असतो. अनेक वेळी निर्माण होणाऱ्या समस्या ह्या आधीच्या समस्येसारख्याच असतात. आता निर्माण झालेली परिस्थिती वा समस्या जुन्या समस्येसारखीच असेल तर पुर्वानुभवामध्ये ती समस्या कशी सोडविली होती याचा आपण विचार करतो व जुन्याच समस्या सोडवणुकीच्या आधारे आताची समस्या सोडवित असतो. उदा. रस्ता चुकणे, गाडी बंद पडणे, जवळ पैसेच नसणे, बॅग हरविणे इ. अशा समस्या निर्माण झाल्यास पुर्वानुभवामध्ये अशावेळी आपण काय केले याचाच विचार करतो व या आधारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो यालाच स्फटीक बुद्धिमत्ता म्हणतात.

Labels:

बुद्धिमत्ता - प्रकार

 बुद्धिमत्ता - प्रकार

टर्मन यांच्या मते, "अमूर्त विचार करण्याची आणि अनुभवांतून काही शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय."

वेश्लर यांच्या मते, "प्रयोजनपूर्वक कार्ये, तर्कनिष्ठ विचार आणि परिस्थितीनुसार परिणामकारक वर्तन करण्याची समुच्चयात्मक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय."

वुडवर्थ यांच्या मते, "विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता होय." 


बुद्धिमत्तेचे प्रकार (Types of Intelligence)

व्यक्तीच्या जीवनातील बुद्धिमत्ता हा घटक अतिशय महत्वाचा आहे. या बुद्धिमत्तेच्या भरवशावर आजच्या काळात व्यक्तीने अनेक क्षेत्रे काबीज केलेले दिसून येते. अशा या बुद्धिमत्तेचे प्रकार किती आणि कोणते आहेत हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी बुद्धिमत्तेच्या पुढील प्रकारांबाबत आपण चर्चा करूया.

१) अमूर्त बुद्धी (Abstract Intelligence)- 

काहीवेळेस व्यक्ती समस्या सोडविण्यासाठी संकेतांचा, चिन्हांचा वापर करते आणि यांचा वापर करून व्यावहारीक जीवनातील व इतर घटकांबाबतचा संबंध सुलभ केला जात असतो यालाच अमूर्त बुद्धी असे म्हणतात. गणितामध्ये अनेक समस्या किंवा प्रश्न हे आकृत्या काढूनच दर्शविलेले असतात. ते प्रश्न आकृत्यांच्या आधारे सोडवावे लागतात तसेच त्यात अनेक अंकचिन्हीत प्रश्नांची कोडी असतात. त्या प्रश्नांची उत्तरे ही अंकाच्या रूपातच द्यावी लागतात. तसेच बेरीज, वजाबाकी व गुणाकार यांना समजून घेवूनच त्यांची एकूण काढावी लागते. हे सर्व अंकांच्या रूपातच समजून घ्यावे लागते व समस्यांचे निराकरण करावे लागते. चिन्हे व सूत्रांचा वापर करून समस्येचे निराकरण बऱ्याच वेळा करावे लागते. चित्रकार, कवी, लेखक, शास्त्रज्ञ इत्यादी व्यक्ती प्रतिके किंवा चिन्हांचा वापर करूनच नव्या संकल्पना जन्मास घालीत असतात. अशाप्रकारे उदमण्य क्षेत्रात अमूर्त बुद्धीच्या साहाय्यानेच व्यक्तीला नव्या संकल्पना तयार करता येतात.


२ ) यांत्रिकी बुद्धी (Mechanical Intelligence) - 

काही क्षेत्रात यंत्रांचा उपयोग करून आपले कार्य पार पाडावे लागते. लहान मुलांना सुरूवातीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात खेळणे तोडण्यात वा बनविण्यात मोठी उत्सुकता असते. त्यातही काही मुलांचे लक्ष हे सतत त्यात बारकाईने काहीतरी करण्यात असते. यातून अशा मुलांची यांत्रिक कल्पना लक्षात येते. साधारणतः व्यावसायिक व्यक्ती, कारखान्यामध्ये यंत्रांवर काम करणाऱ्या व्यक्ती, कामगार, विविध यंत्रे बनविणारे कारागीर, इंजिनियर इ. अशा व्यक्तींमध्ये यांत्रिक बुद्धी असल्याचे दिसून येते. या व्यक्ती आपल्या कल्पकतेने विविध यंत्रांशी संबंधित निरनिराळे भाग बनविण्याचे कार्य करतात. विविध कंपन्यांना लागणारे साहित्य, मुलांच्या विविध खेळण्याच्या वस्तू, विविध कंपन्यांच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट, विविध ठिकाणी विविध क्षेत्रात लागणारे साहित्य इत्यादींमध्ये निपुण असणाऱ्या व्यक्ती हे यांत्रिकी बुद्धी असणाऱ्या असतात.


३) सामाजिक बुद्धी (Social Intelligence) - 

व्यक्ती समाजशील प्राणी आहे. त्यातच प्रत्येक व्यक्तीला सामाजिक संबंध सारख्याच प्रकारचे जोपासता येतात असे नाही किंवा सामाजिक समस्या ओळखून समाजासाठी काम करणे हे प्रत्येकालाच साध्य होत नाही. समाजाच्या अनेक समस्या जाणून घेवून व्यक्तीच्या उच्चाटनासाठी व्यक्तीकडून घडून येणारे वर्तन असणाऱ्या व्यक्ती सामाजिक जाणिवेच्या असतात. अशा व्यक्तीमध्ये समाजाला ओळखण्याची वेगळी क्षमता असल्याचे दिसून येते. सामाजिक समस्येमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य अशा व्यक्ती करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, म. ज्योतिबा फुले अशा व्यक्ती सामाजिक बुद्धी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्याचबरोबर पिडीत आदिवासी जमातींसाठी व्यक्तीकडून घडून येणारे परिवर्तन वा केले जाणारे कार्य, सीकलसेल, प्लेग, कुष्ठरोग जागृतीसाठी व्यक्तींकडून केले जाणारे कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केले जाणारे कार्य, अशा अनेक व्यक्ती ह्या सामाजिक बुद्धिमत्तेच्या असलेल्या दिसून येतात. यांच्यातील सामाजिक प्रेरणाही सामाजिक बुद्धी असल्याचे सुचविते.

अशाप्रकारे मानसशास्त्रज्ञांनी सर्व प्रकारच्या व्यक्तींमध्ये अमूर्त बुद्धी, यांत्रिकी बुद्धी व सामाजिक बुद्धी यापैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धी असल्याचे सुचविलेले आहे.

Labels:

व्यक्तीमत्वाचा पंच घटक सिद्धांत (Big Five Theory of Personality)

 व्यक्तीमत्वाचा पंच घटक सिद्धांत (Big Five Theory of Personality)


व्यक्तीमत्वाच्या संदर्भात पंच घटक प्रारुपावर बऱ्याच शास्त्रज्ञाने कार्य केलेले आहे. या संदर्भात फ्रान्सीस गॅल्टनने सर्वप्रथम कार्य केले व त्यानंतर आलपोर्ट व ऑडवर्ट यांनी पंचघटक प्रारूप मांडले. १९६१ मध्ये ल्युप्स व क्रिस्टल यांनी मांडलेले पहिले पंच घटक प्रारूप मानले जाते. 

सद्यस्थितीत प्रचलीत असलेले प्रारूप कॉस्टा व मॅक क्रे यांनी १९९५ मध्ये मांडले. या प्रारूपात खालील पाच घटक दिसून येतात.

१) चेतापदशा (Neuroticism)

यात शांत, चिंतामुक्त, संयमशील व चिंताग्रस्त, विचलीत, असुरक्षित.


२) बहिर्मुखता (Extraversion) :

यात एकांतप्रिय, गंभीर, लाजाळू व बोलका, समाजशील, स्नेहभाव.


३) समायोजकता (Agreeableness)

यात साशंक, स्वार्थी, आक्रमक व सहयोगी, विश्वासू, प्रेमळ


४) सदसदविवेक बुद्धी (Conscientiousness) :

यात बेशिस्त, निष्काळजी, आळशी व शिस्तप्रिय, मेहनती, जबाबदार.


५) अनुभव सन्मुखता (Openness to Experience) : 

यात पारंपारिक, मठ्ठ, उद्धट व बुद्धिमान, कल्पक, धाडसी.


कॉस्टा व मॅक्रे यांच्या पंच घटक प्रारूपामध्ये प्रत्येक घटकाची दोन टोके आहेत. यात व्यक्ती त्याच्या व्यक्तीत्व गुणानुसार कुठल्यातरी एका टोकावर असल्याचे दिसून येते. हे दोन्ही टोके अगदी विरूद्ध गुण दर्शवितात. या पंच घटक पारूपाच्या साहाय्याने व्यक्तीमत्वाला पडताळणे सहज सोपे कार्य आहे. यातून व्यक्तीमत्व गुण लक्षात येतो.

Labels:

मनाचे (Id, Ego, Super Ego)स्तर सांगा.

मनाचे (Id, Ego, Super Ego)स्तर सांगा.

फ्राईड यांनी मनोविश्लेषणात्मक सिद्धांताच्या आधारे व्यक्तिमत्वाची संरचना केलेली आहे. त्यांच्या मते, व्यक्तिमत्वाचे किंवा मनाचे तीन भाग आहेत ते पुढीलप्रमाणे


दम (Id) - 

इदम्चा प्रवास हा सुखतत्वावर आधारीत आहे. कोणत्याही मार्गाद्वारे आपले समाधान मिळवायचे हा उद्देश यात असतो. आक्रमक, लैंगिक वर्तन आणि सहज प्रवृत्तीसारखे वर्तन हे व्यक्तीकडून निर्माण होत असते. निसर्गनिर्मित ज्या प्रवृत्ती आहेत त्या व्यक्ती पूर्ण करतो; यामध्ये सामाजिक नियमांचे व नैतिक मूल्याचे व्यक्ती कोणत्याही प्रकारे बंधन पाळत नाही. अशाप्रकारचे वर्तन हे लहान मुलामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.


अहम् (Ego) - 

अहम् हा व्यक्तिमत्वातील भाग हा वास्तविक तत्वावर भर देत असतो. अहम् हा जाणिवेच्या अवस्थेत काम करणारा भाग आहे. व्यक्ती समाजासमोर अनैतिक मार्गाने ज्या क्रिया-प्रक्रिया पार पाडू शकत नाही अशा क्रिया-प्रक्रिया व्यक्ती समाजमान्य मार्गाने पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. इदम् आणि अहम् यात या अवस्थेतच संघर्ष चाललेला असतो ज्यामुळे योग्य पद्धतीने कार्य करण्यास व्यक्ती प्रवृत्त होते.


परमअहम् (Super Ego) - 

परमअहम् हा नैतिकता घटकाला अतिशय महत्व देणारा आहे. याला 'सदसद्विवेक बुद्धी' असेही म्हणतात. किंवा 'श्रेष्ठ अहम्' या नावानेही ओळखले जाते. आता नैतिक, समाजमान्य, आदर्श असेच वर्तन घडून येत असते. सामाजिक मूल्याप्रमाणे नीतीप्रमाणे वागणे याच परमअहम्मुळे शक्य होते. यातूनच व्यक्ती प्रतिष्ठा, आदर, मान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो.

अशाप्रकारे फ्राइड यांनी व्यक्तिमत्वाची संरचना या तीन घटकाच्या आधारे केलेली दिसून येते.


Labels:

प्रेरणात्मक संघर्ष स्वरूप, प्रकार

 प्रेरणात्मक संघर्ष, स्वरूप प्रकार


स्वरूप

व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा न थांबणाऱ्या आणि न संपणाऱ्या आहेत. अशा इच्छारुपी गरजा पूर्ण करताना काहीवेळेस तारेवरची कसरत व्यक्तीला निरंतर करावी लागते. एखादी गरज पूर्ण झाली नाही की व्यक्तीमध्ये निराशा निर्माण होते. यातून संघर्षाचे परिणाम समोर येतात. एखादा विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास चार वर्षे करतो आहे पण एकही परीक्षा पास होत नाही अशी परिस्थिती निर्माण होतांना आता अभ्यास करणे सोडावे की सुरू ठेवावे असा व्यक्तीचा विचार चाललेला दिसून येतो. अशा दोन प्रेरणा व्यक्तीत निर्माण झाल्यास त्यापैकी कोणती एक प्रेरणा पूर्ण करावी याबाबत व्यक्तीमध्ये विचार डोकावत असतो. यावेळेस व्यक्तीची द्विधा मनःस्थिती असलेली पाहायला मिळते. यातून प्रेरणा संघर्ष निर्माण झाल्याचे सूचित होते.


प्रेरणात्मक संघर्षाचे प्रकार (Types of Conflict)


प्रेरणात्मक संघर्षाचे २ प्रकार पडतात

अ) व्यक्ती-अंतर्गत संघर्ष (Intraconflict)

ब) आंतरवैयक्तीक संघर्ष (Inter-Conflict)


अ) व्यक्ती-अंतर्गत संघर्ष (Intraconflict)

दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्तीमध्ये असे प्रेरणा संघर्ष निर्माण होताना दिसून येतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत सारख्याच प्रकारच्या गरजांबाबत संघर्ष असलेला दिसून येत नाही तसेच प्रत्येक वेळेससुद्धा व्यक्तीत सारख्याच घटकांबाबत प्रेरणेमध्ये संघर्ष निर्माण झालेला दिसून येत नाही. ही संघर्षाची मालिका व्यक्तीनुसार बदलते तशीच ती वेळेनुसार सुद्धा बदलत असते. 

अशा या अनेकविध प्रेरणा संघर्षाचे प्रकार कोणकोणते आहेत ते पुढीलप्रमाणे लक्षात घेवू या.


१) उपगम-उपगम संघर्ष (Approach-Approach Conflict) 

अनेकवेळा व्यक्तीसमोर दुहेरी ध्येय निर्माण होते. व्यक्तीला दोन्हीही ध्येये ही सारखीच वाटतात पण दोन्ही ध्येये व्यक्ती पूर्ण करू शकत नाही; त्यापैकी व्यक्तीला एकाची निवड करावयाची असते. ज्या संघर्षामध्ये दॉन ध्येयांपैकी फक्त एकाचीच निवड करणे हे शक्य होते अशा संघर्षाला उपगम-उपगम संघर्ष असे म्हणतात. 

उदा. बी.ए.-१ ला विषय निवडताना समाजशास्त्र व मानसशास्त्र असे दोन्ही विषय घ्यावयाचे असल्यास संघर्ष निर्माण होतो. कारण हे दोन्ही विषय एकाच गटात असल्याने दोनपैकी एकच विषय निवडायचा असतो त्यामुळे दोन्ही आवडीच्या विषयांपैकी कोणता विषय निवडायचा याबाबत गोंधळ निर्माण होतो.

यामध्ये व्यक्ती दोन्ही गरजांप्रती सकारात्मक असतो पण एकाचीच निवड करणे व्यक्तीला आवश्यक असते; यामध्ये व्यक्तीत बराच गोंधळ उडतो. कारण एकाच वेळी दोन्ही आवडीची क्षेत्रे वा घटक व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतात. त्याला तौलनिक दृष्टीने कसे काय बघावे असा प्रश्न व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभा राहतो. याबाबत व्यक्तीला वेळेत निर्णय घ्यावयाचा असतो तर दोन्ही ध्येयेही हातातून निसटू शकतात.


२) अपगम-अपगम संघर्ष (Avoidance-Avoidance Conflict) 

व्यक्तीच्या समोर ज्यावेळेस अशी ध्येये उभी राहतात जी दोन्ही ध्येये व्यक्तीला नकोशी वाटतात. व्यक्तीसमोर दोन गरजा उपस्थित आहेत पण त्या नावडत्या आहेत. व्यक्तीला त्या दोन्ही गोष्टी नाकारता येत नाही; त्यातली एक गोष्ट तरी व्यक्तीला स्विकारावी लागते. दोन नावडत्या गोष्टींपैकी कोणती एक निवडायची असा संघर्ष जेव्हा निर्माण होतो त्या संघर्ष प्रकाराला अपगम- अपगम संघर्ष असे म्हणतात. 'इकडे आड तिकडे विहीर' अशीच अवस्था या संघर्ष प्रकारात होत असल्याची दिसून येते.

उदा. बारावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतांना गणित आणि भौतिक हे विषय सोडून विद्यार्थ्याला प्रवेश निश्चित करावयाचा असतो परंतु दोन्ही विषय विद्यार्थ्याला नकोसे वाटतात; यापैकी कोणताच नको असे वाटत असते. दोनपैकी एक तर कोणतातरी घ्यावाच लागेल नाहीतर बारावीला प्रवेश होणारच नाही. अशावेळी दोन्ही विषय नावडते असतांना गणित किंवा भौतिक यापैकी एकाची निवड करावीच लागते. एखाद्या ठिकाणी काही वर्षाच्या परिश्रमानंतर नोकरीची ऑर्डर आली. त्यात व्यक्तीसमोर दोन ठिकाणची नावे डोळ्यासमोर देण्यात आली. 

कोणतेतरी एक ठिकाण व्यक्तीने निवडावे अशी त्यात अट आहे. अशावेळी व्यक्तीत संघर्ष निर्माण होतो. दोन्ही नको आहे पण त्यातील एक निवडावे लागेल कारण एकही निवडले नाहीतर हातची नोकरी देखील सोडावी लागू शकते. अशा प्रकारचा प्रेरणा संघर्ष वैयक्तिक जीवनात अनेकदा निर्माण झालेला असतो. अशावेळी दोन ध्येयांपैकी दोन्हीही नको असे ठरविणे फारच घातक असते. या संघर्ष प्रकारातून भावनिक ताण मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. यातून मार्ग काढणे म्हणजे तारेवरची कसरतच असते.


३) उपगम-अपगम संघर्ष (Approach - Avoidance Conflict) 

या प्रकारच्या संघर्षामध्ये व्यक्तीसमोर एकच ध्येय असते. त्याला निवडावे की निवडू नये असा द्विधाभाव निर्माण होतो; ज्यात एकाच घटकाबद्दल आवड वा नावड निर्माण झालेली असताना जो संघर्ष निर्माण होतो त्या संघर्ष प्रकाराला उपगम-अपगम संघर्ष असे म्हणतात. एकाच वेळी एकच गोष्ट स्विकारावी की स्विकारू नये असे वाटत असते. उदा. जिम लावल्यास शरीराला पूर्णतः आकार येईल व शरीर योग्य व मजबूत दिसेल पण जिमने हाताचे दुखणे वाढेल, अशी द्विधा अवस्था निर्माण होते. आजीच्या गावाला गेला तर खूप फ्रेश वाटेल व मज्जा करता येईल पण पुस्तकासाठी जमविलेला पैसा तिकीटामध्ये निघून जाईल अशी भिती निर्माण होते. असे एकाच गोष्टीबद्दल आकर्षणता व विकर्षता निर्माण होते.

अशाप्रकारे या संघर्षात व्यक्तीसमोर एकच उद्दीष्ट निर्माण झालेले असते पण त्या एकाच उद्दीष्टाबद्दल अनुकूल भाव काही वेळासाठी निर्माण होतात तर काही वेळासाठी प्रतिकूल भाव निर्माण होतात. आकृतीमध्ये धन आणि ऋण अशी परिस्थिती दाखविलेली आहे. या बाबतीत एकाच उद्दीष्टाबाबत असा दुहेरी पेच निर्माण झाला असता त्यातून मार्ग काढणे इतके शक्य नाही. याबाबत मेंदूमध्ये बरीच कालावाकालव झालेली असते. दीर्घकाळपर्यंत दोलायमान परिस्थिती व्यक्तीची निर्माण होत असते. अशा संघर्षमय परिस्थितीत एका धन किंवा ऋण निर्णयापर्यंत यावे लागते. यातील एका घटकाला निवडण्यासाठी संघर्ष वाढतो. चिंता, ताणतणाव वाढून आंतरीक संघर्ष वाढायला लागतो.

४) द्विउपगम-अपगम संघर्ष (Double Approach - Avoidance Conflict) 

या संघर्ष प्रकारात व्यक्तीसमोर दोन क्षेत्रे असतात; यातील प्रत्येक एका क्षेत्राबद्दल आवड वा नावड असे द्विमत तयार झालेले असते. अशा संघर्ष प्रकाराला द्वि-उपगम-अपगम संघर्ष असे म्हणतात. अशा क्षेत्रापैकी एका क्षेत्राची निवड करणे आवश्यक वा अपरिहार्य असते. विवाहासाठी वर निवडताना मुलगा नोकरीला आहे पण दूर आहे असा विचार निर्माण होतो. आपल्या भागातला मुलगा खाजगी कंपनीला आहे पण साधारण आहे. यापैकी दोन्ही ध्येयांबाबत मुलीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. नेमक्या कोणत्या मुलाची जोडीदार म्हणून निवड करायची अशी द्विधा मनःस्थिती तयार होत असते.

अशाप्रकारे अनेक वेळा दोन वेगवेगळे क्षेत्र डोळ्यासमोर उभे राहतात. दोन्हीही क्षेत्रात काही चांगल्या गोष्टी असतात तर काही बाबतीत नकोशा गोष्टी असतात. दोन्ही क्षेत्राबाबत आवड वा नावड अशी परिस्थिती निर्माण होत असते. या दोन क्षेत्रामध्ये निवड करतांना अतिशय तारेवरची कसरत होते. द्विधाभाव स्थिती निर्माण झालेली असते. मोठ्या प्रमाणात ताण हा वाढत जातो, पण यातूनही कोणत्यातरी एका क्षेत्राची व्यक्तीला निवड करणे इष्ट ठरते कारण यातून संघर्षाला पूर्णविराम मिळतो. आनंद व समाधान मिळण्यास मदत मिळते.

अशाप्रकारे अपगम-अपगम, उपगम-उपगम, उपगम-अपगम, द्विउपगम- अपगम संघर्ष व्यक्तीगत जीवनामध्ये निर्माण होत असतात; ज्यातून योग्य मार्ग काढल्यास व्यक्तीचे आयुष्य हे अधिक सुकर होण्यास मदत मिळते.


ब) आंतरवैयक्तीक संघर्ष (Inter-Conflict)i

व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे. त्यामुळे कोणत्याही दोन व्यक्तीमधील मतात, विचारात बरीच भिन्नता, फरक असलेला दिसून येतो. व्यक्ती-व्यक्तीमध्ये असलेला हा संघर्ष असतो. दोन व्यक्तीपैकी एका राजकीय क्षेत्रातील बदल महत्वाचा वाटतो तर दुसऱ्या व्यक्तीला सामाजिक बदल अतिशय महत्वाचा वाटतो. म्हणजेच दोन व्यक्तीमधील एका विचारावर ठाम नसण्याची विचारसरणी यात असलेली दिसून येते. दोन्हीही व्यक्ती आपला मुद्दा बरोबर आहेत असे म्हणतात व कोणा दुसऱ्याचे ऐकूण घेणे त्यांना श्रेयस्कर वाटत नाही.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात बऱ्याचदा व्यक्ती कार्य करीत असतात. एकाच क्षेत्रात सोबत दोन व्यक्तींनी कार्य केल्यानंतर बऱ्याचदा दोन व्यक्तीत संघर्ष निर्माण होतो व दोन्ही व्यक्ती एक दुसऱ्यापासून दूर जातात. अशावेळी त्यांच्यातील संघर्षाच आपल्याला पाहायला मिळतो. राजकीय पक्षात बरेचदा असेच होते. दोन व्यक्तीत फुटीरता निर्माण होते. हे एका मुद्यावर ठाम मत न झाल्याने निर्माण होते. शिक्षणावर भर देणारे दोन व्यक्ती आहेत मात्र एकाला धार्मिक शिक्षण महत्वाचे वाटते तर दुसऱ्याला लैंगिक शिक्षण महत्वाचे वाटते. पण आपले म्हणणे हेच बरोबर आहे असे दोन्ही व्यक्तीला वाटते. तेव्हा माघार घेणे दोन्हीला जमत नाही म्हणून शैक्षणिक प्रेरणेने जागृक असणाऱ्या व्यक्ती-व्यक्तीत हा संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

Labels:

प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणेचे विविध प्रकार

 प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणेचे विविध प्रकार स्पष्ट करा.


जे. पी. गिलफोर्ड यांच्या मते, “कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देणारी किंवा ती क्रिया चालू ठेवण्यास प्रवृत्त करणारी आंतरीक प्रचोदक शक्ती म्हणजे प्रेरणा होय." 


प्रेरणांचे प्रकार (Types of Motive)

प्रेरणांचे २ प्रकार पडतात.
१. जैविक प्रेरणा (Biological Motives) 
२. सामाजिक प्रेरणा (Social Motives) 


अ) जैविक प्रेरणा (Biological Motives) :

जैविक प्रेरणा ह्या व्यक्तीच्या जीवाशी संबंधित आहे, यालाच 'शारीरिक प्रेरणा' असेसुद्धा म्हणतात. या प्रेरणा पूर्ण झाल्याशिवाय व्यक्ती जीवंत राहणे शक्यच नाही. या प्रेरणांची पूर्ती करण्यासाठी व्यक्तीला धडपड करावी लागते तसेच व्यक्ती स्वतःहून प्रयत्न करतोच. अशा या अतिआवश्यक जैविक प्रेरणा कोणत्या हे पुढील घटकांवरून लक्षात येईल.


१) भूक (Hunger) - 

भूक ही व्यक्तीची प्राथमिक गरज आहे. काही वेळ वा एक-दोन दिवस व्यक्ती अन्नाशिवाय राहू शकतो, परंतु नंतर यापासून दूर राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यावरच कुन्हाड मारून घेण्यासारखे आहे. 

अशा या 'भूक' जैविक गरजेमध्ये कोणत्या शारीरिक यंत्रणेची महत्वाची भूमिका असते हे पुढील मुद्यांवरून जाणून घेवू या.

१.अधश्चेताक्षेपक : भुकेची प्रेरणा निर्माण करण्याच्या कार्यात अधश्चेताक्षेपकाचा अतिशय महत्वाचा कार्यभाग असतो. भुकेचे मुख्य नियंत्रण कार्य या भागाद्वारेच घडून आलेले दिसते. यातील 'लेटरल हायपोथेलॅमस' हा भाग आपल्याला 'भूक लागलेली आहे' अशी सूचना प्रदान करते. तसेच 'वेन्ट्रो मिडीयल हायपोथेलॅमस' हा भाग आपल्याला भूकेचे क्षमन झाल्याचे, तृप्ती, समाधान झाल्याची सूचना देतो. अशाप्रकारे संपूर्ण हे केंद्र व्यक्तीला भूकेच्या गरजेबाबत समस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो.

२.जठराचे आकुंचन : अन्नाबाबत गरज निर्माण झाल्यास वा भूक लागल्यास जठर आकुंचनाची क्रिया निर्माण होते. जठराचे आकुंचन निर्माण झाल्यास चेतापेशीद्वारे याची सूचना अधश्चेताक्षेपकाला मिळते, ज्यातून व्यक्ती अन्नासाठीचे प्रयत्न करतो व अन्न मिळताच जठराचे आकुंचन होणे थांबते.

३.शरीरातील चरबी : अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरामध्ये चरबी साठली जाते. या चरबीतून 'ऑब' नावाचे प्रोटीन रक्तात मिसळले जातात. याचे संकेत अधश्चेताक्षेपकाला मिळाल्यास अन्नाची मात्रा घेणे कमी होते.

४.रक्तशर्करा : भुकेच्या मात्रेवर रक्तशर्करेचा परिणाम होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीची भूक वाढते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास व्यक्तीची भूक मंदावते. याबाबतचे संकेत अधश्चेताक्षेपकाला चेतापेशीमार्फत मिळत असतात, यातूनच अन्नग्रहण कितपत करायचे याबाबतचा संदेश मिळत असतो.

५.सामाजिक सांस्कृतिक घटक: भूकेची मात्रा ही शारीरिक यंत्रणेवरच अवलंबून राहत नाही तर यामध्ये सामाजिक-सांस्कृतिक घटकांचाही हातभार लागत असतो. प्रदेशानुसार, संस्कृतीनुसार काही विशेष पदार्थ प्रसिद्ध असतात. अशा प्रसिद्ध पदार्थांची मेजवानी असल्यास व्यक्तीकडून जरा जास्तच खाल्ले जाते. मथुरेचा पेढा समोर दिसताच जेवण केल्यानंतरही एक-दोन पेढे जाणिवपूर्वक खाल्ले जातात. महाराष्ट्रात भाकरी प्रसिद्ध आहे. परंतु आता दुर्मिळ झालेली आहे. ती दिसताच व्यक्ती पोळीपेक्षा नवाळी म्हणून भाकरीला अग्रस्थान देतात. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपल्याकडील प्राणी हे अतिशय प्रिय अन्न म्हणून खातात. मात्र त्यासाठी आपल्याकडे नाक मुरडतात, हा सामाजिक संस्कृतीतच फरक आहे, ज्यामुळे भूक किंवा अन्न घेण्यावर फरक पडत असतो.


२) तहान (Thirst) - 

तहान या घटकाला अतिशय महत्वाची शारीरिक प्रेरणा म्हणून ओळखले जाते. अगदी भूकेपेक्षाही पाण्याची व्यक्तीला प्राथमिक गरज आहे. अन्नाशिवाय काही वेळेपर्यंत व्यक्ती राहू शकतो परंतु पाण्याशिवाय व्यक्तीचे जगणे कठीणच होवून जाते. म्हणूनच पाण्याला हे 'जीवन' म्हटलेले आहे. या पाणी पिण्याची क्रिया सुद्धा अधश्चेताक्षेपकावरच अवलंबून असते. तहान लागण्यासाठी कोणते घटक महत्वाची भूमिका बजावतात वा सक्रीय असतात ते पुढील मुद्यांवरून लक्षात येईल.

१.घशाची कोरड : तहान लागली आहे हे कशावरून माहिती पडत असेल ते म्हणजे घसा किंवा तोंड कोरडे पडल्यामुळे होय. 'तोंड किंवा घसा कोरडा झाला आहे' असे अनेकांकडून आपल्याला ऐकायला मिळते म्हणजे व्यक्तीची पाण्याची मागणी आहे हे त्या विधानावरून लक्षात येते. कॅनन यांच्या शोधावरून असे दिसून येते की, घशाला कोरड पडल्याचे संकेतच अधश्चेताक्षेपकाला मिळाले नाही तर तहान लागत नाही. तोंडामध्ये पाणी घेतल्यास तहानेची मात्रा कमी होवून पाण्याची गरज संपते.

२.रक्त प्रमाण : शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर रक्तातील प्रमाण अवलंबून असते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास रक्ताच्या प्रमाणात घट होते तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मूत्रपिंडाकडून रक्तवाहनाचे संकेत मिळून रक्तवाहिन्यामध्ये आकुंचन निर्माण होते. यातील संदेशाचे वहन मेंदूपृष्ठ तसेच अधश्चेतकाला मिळते. त्यातून पाणी घेण्यास वा नाकारण्याचा संदेश मिळत असतो. 

३.पेशीतील द्रव पदार्थाचे प्रमाण : पेशीतील द्रव पदार्थाचे प्रमाण शरीरातील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. शरीरातील पाण्याचे भाग कमी झाल्यास शरीर पेशीबाहेर असलेल्या सोडीयम या क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर पेशीतील द्रव पदार्थ बाहेर येतो व शरीर पेशीतील द्रव पदार्थ कमी होते. चेतापेशीमार्फत माहिती ही अधश्चेताक्षेपकास मिळाल्यानंतर अन्डीडाययुरेटीक हार्मोन्सचा स्त्राव रक्तात मिसळल जातो. यामुळे मूत्रपिंडातील पाणी शोषले जाते व शरीरातील पाण्याच समस्थिती ठेवली जाते. अशा स्थितीत अधश्चेताक्षेपकाकडून पाण्याच शोध घेतला जातो. शरीरपेशीतील द्रव्य पदार्थाचे प्रमाण व्यवस्थित ठेवले जाते.


३) निद्रा (Sleep) - 

शारीरिक प्रकारच्या गरजेमध्ये निद्रेला सुद्धा अतिशय महत्वाचे स्थान आहे. याची प्रचिती जी व्यक्ती एक वा दोन दिवस झोपलेली नसेल त्यांची अवस्था पाहल्यानंतर येईल. यासाठी काही व्यक्ती झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतांना दिसतात. व्यक्ती सतत कामात असल्यास व्यक्तीमधील ऊर्जा कमी होते व स्नायूंना थकवा येतो. यातून व्यक्तीला विश्रांतीची गरज भासते. त्यामुळे व्यक्ती झोप घेताना दिसते. या झोपेच्या मात्रेत व्यक्तीनुसार भिन्नता दिसून येते. काही अधिक स्वस्थ झोपतांना दिसून येतात तर काही इकडे तिकडे सारखे कड फिरवितात.

या झोपेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सुद्धा अधश्चेताक्षेपकाकडूनच होत असते. झोपेच्या काळात व जागृत अवस्थेच्या काळात मेंदूमधील बदल पाहिल्यास फरक लक्षात येतो. व्यक्ती झोपलेला आहे की जागृत आहे हे मेंदू लहरी मेंदूमध्ये कोणत्या आहेत यावरून सांगता येते. व्यक्ती गाढ झोपेत असताना 'डेल्डा लहरी' प्रामुख्याने पाहायला मिळतात तर जागृत अवस्थेत 'अल्फा लहरी'चे प्रमाण मेंदूमध्ये असलेले दिसून येते. या झोपेवरही समान व सांस्कृतिक घटकांचा परिणाम झालेला असतो तसेच त्यावरील नियंत्रणसुद्धा व्यक्ती आजूबाजूच्या वातावरणामधूनच शिकत असतो.


४) लैंगिक प्रेरणा (Sex Motivation) - 

लैंगिक प्रेरणा ही शारीरिक प्रेरणा आहे. भूक, तहान व निद्रा या शारीरिक प्रेरणेवर आंतरीक उणीवेचा परिणाम जास्त दिसून येतो मात्र लैंगिक प्रेरणेवर बाहेरील घटकांचाच परिणाम जास्त होतो. लैंगिक प्रेरणा पूर्ण होण्यासाठी व्यक्ती-व्यक्तीत संबंध प्रस्थापित होणे महत्वाचे आहे. ही प्रेरणा व्यक्तीच्या जीवनमरणाशी संबंधित नाही. या प्रेरणेवर नियंत्रण ठेवल्यास कोणतीही हानी होत नाही. समाजमान्य मार्गाने याचे विरेचन झाल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते.

लैंगिक प्रेरणा ही पुढील पिढीला चालना देते. पिढी अस्तित्वात येण्याचे कारण लैंगिक प्रेरणाच ठरते, यासाठी लैंगिक प्रेरणा निर्मितीस शरीरामधील कोणते घटक जबाबदार आहे तसेच बाहेरील कोणते घटक जबाबदार आहे हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरते. व्यक्तीमधील स्त्री व पुरुष अशा दोघामध्येही ग्रंथीरसाचे स्त्रवण होत असते. पुरुषामध्ये अॅड्रोजेन व स्त्रीमध्ये एस्ट्रोजेन या ग्रंथीतून होणारे स्त्राव लैंगिक प्रेरणा निर्माण करण्यास मदत करतात, यावर नियंत्रण अधश्चेताक्षेपकच करीत असते. लैंगिक प्रेरणेमध्ये विरुद्धलिंगी व्यक्ती ह्या एकमेकांकडे आकर्षित होत असतात. यासाठी मेंदूतील अॅम्फिटमाईनशी संबंधित स्त्रावामध्ये वाढ झालेली दिसते.

लैंगिक प्रेरणा निर्मित होण्यास इतर बाह्य घटकसुद्धा जबाबदार असतात. आजची टीव्हीवरील अनेक दृश्ये, पेपरमधील अनेक चित्र हे लैंगिक प्रेरणेला उत्तेजनच ठरत असते म्हणजेच व्यक्तीमधील सौंदर्य, मोहकता, आकर्षकतेचा लैंगिक प्रेरणा निर्मितीत महत्वाचा वाटा असल्याचे दिसून येते.

अशाप्रकारे भूक, तहान, निद्रा व लैंगिक प्रेरणा इ. शारीरिक प्रेरणा व्यक्तीमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणून व्यक्तीला शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ बनविण्याचा प्रयत्न करतात.


ब) सामाजिक प्रेरणा (Social Motives) 

व्यक्तीचे समाजाशी अतिशय महत्वाचे व घनिष्ठ नाते आहे. व्यक्ती या समाजातच वावरतो आणि अनेक गोष्टी त्यातून शिकून आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करीत असतो. विकास विषयाची अनेक तत्वे या समाजामधूनच व्यक्ती शिकत असतो. सामाजिक प्रेरणा ह्या व्यक्ती इतरांच्या अनुकरणातून शिकत असतो. अशा कोणत्या सामाजिक प्रेरणा आहेत त्याची चर्चा पुढीलप्रमाणे करूया.


१) संपादन प्रेरणा (Achievement Motivation) - 

संपादन वृत्ती बाळगणाऱ्या व्यक्ती ह्या नवीन कार्याला सामोरे जाणाऱ्या असतात. नवीन आव्हाने पेलणाऱ्या असतात. कार्यप्रवीण असतात, कार्याभिमुख असतात. यांना विशिष्ट यश हवे असते. जास्तीत जास्त नवनवीन करण्याकडे यांचे लक्ष असते. त्या संपूर्ण चिकाटीने व जिद्दीने कार्य करणाऱ्या असतात. व्यक्तीला कोणतीही गोष्ट ही आपोआप मिळत नाही तर ती गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा प्रेरणा पालकांकडून मुलेही शिकतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातील अनेक व्यक्तींकडून शिकत असतात.


२) प्रभुत्व प्रेरणा (Power Motivation) - 

यास 'सत्ता प्रेरणा' असेही म्हणतात. प्रभुत्व प्रेरणा ही एक सामाजिक प्रेरणा आहे. इतर व्यक्तीपेक्षा श्रेष्ठत्व गाजविण्याची भावना प्रत्येक व्यक्तीत असते. आपण इतरांपेक्षा, दुसऱ्यापेक्षा सरस असावे असेही काही व्यक्तींना वाटत असते. यातून ह्या व्यक्ती अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत असतात. इतरांना संमोहीत करून त्यांना आपल्या मताप्रमाणे करावयाला ते भाग पाडतात. प्रभुत्व प्रेरणेने प्रभावी झालेल्या व्यक्ती इतरांवर पुरेसा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात.

प्रत्येक व्यक्तीची प्रभुत्वाची शैली ही वेगवेगळी असलेली दिसून येते. काही व्यक्ती ह्या फूटबॉल खेळात मेहनत घेवून त्यात आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. काही व्यक्ती हे चित्र रंगविण्यातून आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती बोलण्याच्या शैलीतून इतरांना प्रभावित करून राजकारणात सक्रीय नेते म्हणून पुढे येतात. काही व्यक्ती सामाजिक कार्य करून आपला प्रभाव इतरांवर टाकत असतात. आपल्या अंगी विशेष असा गुण आणून इतरांचे लक्ष स्वतःकडे आकृष्ट करण्यात काही व्यक्ती ह्या फारच यशस्वी ठरतात.


३) आक्रमण प्रेरणा (Aggression Motivation) -

आक्रमणाचे प्रकार घडून येण्यासाठी विविध प्रकारची कारणे जबाबदार आहे. उच्च तापमानाच्या स्थितीमध्ये जास्त आक्रमण घडत असल्याचे दिसते. आपला अपमान कोणी केला असता अशावेळी व्यक्तीकडून आक्रमक वर्तन घडून येते. टीव्ही, चित्रपट, न्यूजपेपर इत्यादींमधून आक्रमकतेचे चित्र पाहून आक्रमकतेची प्रेरणा व्यक्तीत जागृत होते. व्यक्ती आपल्या इच्छित उद्दीष्टांसाठी स्वतःकडून असे वर्तन घडवून आणतो. प्रत्येक व्यक्तीचा इच्छित उद्देश हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचे जीवन हे सारखे नसते.


४) सहवास प्रेरणा :

सहवासाच्या गरजेतून अनेक कुटुंब जुळलेले दिसून येतात. अनेक संघटना स्थापित होत असतांना दिसतात व अनेक देश एकसंघ असलेले दिसतात. व्यक्ती मोठी झाल्यानंतर व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला कोणाची ना कोणाची गरज लागतच आहे. यातून व्यक्ती इतरांची आवश्यकता समजून जातो. यातून व्यक्तीची सहवासाची गरज आणखी वाढत जाते. सहवासाची गरज व्यक्तीला आनंद, सुख व समाधान मिळवून देत असते.


५) प्रतिष्ठा प्रेरणा (Prestige Motivation) - 

प्रत्येक व्यक्ती आपण एक विशिष्ट व्यक्ती व्हावे यासाठी प्रयत्नरत असते. समाजाने आपल्याला एका विशिष्ट नावाने ओळखावे असेही व्यक्तीला वाटत असते. म्हणूनच व्यक्ती त्या पद्धतीने आपली प्रतिमा इतरांसमोर ठसविण्याचा प्रयत्न करीत असतो. यातूनच व्यक्तीला स्वतःला मानाचे स्थान मिळावे, प्रतिष्ठा मिळावी असे वाटत असते.

प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या गरजेतूनच व्यक्ती समाजसेवा संस्था काढून समाजसेवेचे कार्य हाती घेतो. एखाद्या कलेमध्ये कौशल्य मिळवितो, वर्गामध्ये पहिला येण्याचा प्रयत्न करतो, स्पर्धेमध्ये सहभागी होतो, अतिउच्च पदवी घेतो, डोंगराची सैर करतो, वृद्धांची सेवा करतो, कार्यक्रमात सक्रीय राहतो इत्यादी प्रकाराने सहभागी होवून वा कार्य करून नावारूपास येण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या प्रकारची कार्य करण्याची वृत्ती दिसून येते. त्या त्या प्रकारच्या कार्यातून व्यक्तीला विशेषत्वाने ओळखले जाते, असे व्यक्तीला वाटत असते. अशा प्रतिष्ठेची गरज काहींच्या ठिकाणी उच्च तर काहींच्या ठिकाणी निम्न असलेली दिसून येते. उच्च प्रतिष्ठेची गरज असणाऱ्या व्यक्ती आपल्या कार्यात सर्वात उच्चता मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात.

प्रतिष्ठेची गरज पूर्ण झाल्यास व्यक्तीला मानसिक सुख, आनंद मिळत असते. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविले असे व्यक्तीला वाटते व यातूनच आपली ओळख आपण निर्माण करू शकलो असे व्यक्तीला वाटते. याच भावनेतून व्यक्ती सुखावतो.


६) स्वीकृतीची प्रेरणा (Acceptance Motivation) -

स्वीकृतीच्या भावनेतूनच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी अतिशय जाणीवपूर्वक, प्रेमाने व आदराने वागण्याचा प्रयत्न करते. यासाठी सामाजिक, नैतिक मूल्यसुद्धा जबाबदार असतात. या नैतिक मूल्यांच्या आधाराने व्यक्तीचे वर्तन चांगले घडून आले तर व्यक्तीला इतरांकडून चांगल्या पद्धतीने स्वीकारले जाण्याची तीव्रता बळावते.

Labels: